प्रतिनिधी : सुरेश शिंदे
तळेगाव दाभाडे : मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा,आणि लहान वयातच मुलांमध्ये स्टेजवर येवून आपली कला सादर करण्याचे धाडस यावे यासाठी कलापिनी बालभवनमध्ये दर तीन महिन्यांनी बालअविष्कारमंच सादर केला जातो. काल संध्याकाळी बालभवनमध्ये या वर्षातला पहिला बाल अविष्कारमंच चिमुकल्यांच्या चिवचिवाटात आणि उत्साहात साजरा झाला..बरोबर पाच वाजता सगळी मुलं छान छान ड्रेस घालून आपले आईबाबा,आजी आजोबांबरोबर बालभवन मध्ये हजर होती.स्टेजवर केलेली सजावट,त्यानी स्वतः काढलेली चित्रे पाहुन चिमुकल्यांचे डोळे आनंदाने चमकत होते.
आपल्याला स्टेजवर आईबाबांसमोर सादरीकरण करायला मिळणार याचा आनंद प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर दिसत होता. कार्यक्रमाच्या सुरवातीला नटराजपूजन करुन मुलांनी श्लोक आणि प्रार्थना सादर केली. नंतर टण् टण् घंटा झाली मुले पळाली धूम् आणि गट्टी फू, खंडाळ्याचा घाट, वर्षाराणी माझ्या घरी येशील का? अशी सुंदर बालनृत्य सादर केली.
पालकांनी आपल्या मनोगतातून आपल्या मुलांना लहान वयात बालभवनमुळे कलापिनीचे व्यासपीठ मिळाले आणि त्यामुळेच त्यांच्या विविध कलांना फुलण्याची संधी मिळतेय. मुलांमध्ये बालभवनमुळे अनेक छान बदल होत आहेत हे आवर्जून सांगितले.
बालभवनप्रमुख मधुवंती रानडे यांनी आपल्या प्रास्तविके मधून वर्षभर मुलांसाठी घेतले जाणारे वेगवेगळे उपक्रम,स्पर्धा,सणसमारंभ याबद्दलची माहिती सांगितली.पालकांनाही मुलांबरोबर बालभवनच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचे आहे हे सांगितले. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशिक्षिका ज्योती ढमाले तर कार्यक्रमाचे नियोजन बालभवनप्रमुख मधुवंती रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली बालभवन प्रशिक्षिका विशाखा देशमुख, मनिषा शिंदे,ज्योती ढमाले,माधवी एरंडे यांनी केले.
कार्यक्रमाला कलापिनीचे जेष्ठ सदस्य आणि कलाकार मीरा कोन्नुर, अनघा बुरसे,बुरसेकाका,रानडेकाका उपस्थित होते.पालकांची उपस्थिती भरपूर होती. बालभवनच्या प्रार्थनेने सुंदर कार्यक्रमाची सांगता झाली.